मुख्यमंत्र्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल
लखनौ: छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांचे वडील नंदकुमार बघेल यांनी नुकतंच उत्तर प्रदेशमध्ये जावून पोलिसांनी ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केले होते.
नंदकुमार बघेल यांनी उत्तर प्रदेशमध्ये ब्राम्हणांविरोधात केलेले हे वक्तव्य येथेच थांबत नाही. ते पुढे असेही म्हणाले, की “मी भारतातील सर्व गावकऱ्यांना आवाहन करतोय की ब्राह्मणांना तुमच्या गावात येऊ देऊ नका. मी इतर सर्व समुदायाशी देखील यांसंदर्भात बोलेल, जेणेकरून आपण त्यांच्यावर बहिष्कार टाकू शकू. ब्राम्हणांना व्होल्गा नदीच्या तीरावर (म्हणजेच त्यांच्या मूळ प्रदेशात युरेशियामध्ये) परत पाठवण्याची गरज आहे,” असे नंदकुमार बघेल म्हणाले.
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणावर, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रतिक्रिया दिलीn आहे. ते म्हणाले की, या देशात कायदा सर्वोच्च आहे आणि त्यांचे सरकार सर्वांसाठी आहे. “कोणीही कायद्याच्या वर नाही, जरी ती व्यक्ती माझे ८६ वर्षांचे वडील असले तरीही. छत्तीसगड सरकार प्रत्येक धर्म, पंथ, समुदाय आणि त्यांच्या भावनांचा आदर करते. माझे वडील नंदकुमार बघेल यांनी एका विशिष्ट समुदायाविरोधात टिप्पणी केली आहे. त्यांनी सांप्रदायिक शांतता भंग केली असून त्यांच्या वक्तव्यामुळे मलाही दु: ख झाले आहे,” असे मुख्यमंत्री बघेल म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “माझे आणि माझ्या वडिलांचे राजकीय विचार आणि विश्वास वेगळे आहेत. एक मुलगा म्हणून मी त्यांचा आदर करतो पण मुख्यमंत्री म्हणून मी त्यांची अशी चूक माफ करू शकत नाही, ज्यामुळे राज्यातील सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता बिघडू शकते,” असेही मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले. दरम्यान या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.
नंदकुमार बघेल यांनी यापूर्वीही अनेकवेळा असे विधान केले आहे. भारतातील जातीवाद, धर्मवाद आणि दलीत, आदिवासी, ओबीसी, बहुजन लोकांच्या अधोगतीसाठी भारतातील ब्राह्मण समाज जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ब्राह्मण समाज आणि ब्राह्मणवादी व्यवस्थेपासून सुटका घ्यायची असेल तर बहुजन समाजाने बुद्ध- आंबेडकरी विचारांवर चालवण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात अनेकवेळा केले आहे.