रुपुर येथील शेतकऱ्यांना पीक कर्ज २५ ऑगस्टपूर्वी देण्याचे आश्वासन
हिंगोली: आझाद समाज पार्टीच्या पाठपुराव्यानंतर गंगानगर- कारवाडी भागातील सामाजिक सभागृहाचे प्रत्यक्ष बांधकाम १८ ऑगस्ट रोजी पासून सुरू करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न निकाली निघणार आहे. याच बरोबर, कळमनुरी तालुक्यातील रूपुर येथील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे आश्वासन कॅनरा बँकेच्या व्यवस्थापकाने दिले असल्याने आता या गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पीक कर्ज मिळणार आहे. त्यामुळे आझाद समाज पार्टीचे तालुका प्रमुख प्रशांत बलखंडे यांनी आत्मदहन आंदोलन स्थगित केले आहे.
गंगानगर - कारवाडी भागातील सामाजिक सभागृहाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या स्थानिक विकास निधीतून या सभागृहासाठी ५ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. सभागृहाच्या बांधकामासाठी सर्व मान्यता मिळाल्या आहेत. शिवाय कंत्राटदार सुद्धा काम करण्यास तयार करताना, काही लोकांनी या सामाजिक सभागृहाला विरोध केला होता. त्यानंतर, आझाद समाज पार्टीच्या वतीने, दिनांक १२ रोजी हिंगोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांची भेट घेवून सभागृहाचे बांधकाम तत्काळ सुरू करण्यात यावे, कामाला विरोध करणाऱ्या लोकांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत, बांधकाम करण्यास गुत्तेदार तयार नसेल तर दुसरा गुत्तेदार नियुक्त करावा, बांधकाम करतांना गरज पडल्यास गुत्तेदारास पोलीस संरक्षण देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या.
तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. यावेळी आझाद समाज पार्टीचे जिल्हाप्रमुख ॲड. रावण धाबे, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सचिन पट्टेबहादुर, जिल्हा महासचिव ॲड. अभिजित खंडारे यांच्यासह स्थानिक महीला मंडळाच्या महिला उपस्थित होत्या. त्यानंतर, आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने १८ ऑगस्ट पासून बांधकाम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. तर रुपुर येथील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याच्या मागणीसाठी आझाद समाज पार्टीचे कळमनुरी तालुका प्रमुख प्रशांत बलखंडे यांनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
त्यानंतर पोलीस प्रशासनाने कार्यवाही सुरू करून कॅनरा बँकेच्या व्यवस्थापकास बोलुन कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासाठी सूचना केल्या. त्यामध्ये बँक व्यवस्थापकाने २५ ऑगस्टपूर्वी पीक कर्ज वाटप करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हा प्रश्नही निकाली निघाला.