नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील घटना
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. सध्या बहुतांश शाळा बंद असल्या तरी मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. मात्र शिक्षणासाठी मोबाईल घेण्याची ऐपत नसल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. नांदेड जिल्हयातील नायगावमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
अकरावीत शिकणारी बुद्धशीला प्रकाश पोटफोडे (१७) असे मयताचे नाव असून सदर विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना १६ जूनला सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास नायगाव शहरातील फुलेनगर येथे घडली. प्रकाश पोटफोडे हे पती-पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांना दोन मुले व एक मुलगी असून दोन्ही मुलेही मजुरी करून शिक्षण घेतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे ते तिला मोबाईल घेऊन देऊ शकले नाही. यामुळे हताश झालेल्या एका गुणवान तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवले.
लवकरात लवकर उपाययोजनाची गरज
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने, सरकार आणि शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला. पण या ऑनलाईन शिक्षणाचा ग्रामीण भागासह अनेक शहरांमध्ये काहीही फायदा होत नाही. खेड्य़ांमध्ये सुविधा नाही. याचा विचार होणं गरजेचं होतं. पण तसं झालं नाही. त्यातच खेड्यापाड्यात आधीच आर्थिक स्थिती हालखीची असते. मोलमजुरी करुन हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबात स्मार्टफोन इंटरनेट यासर्व गोष्टी फार दुर्मिळ असतात. एकीकडे बिकट आर्थिक परिस्थिती तर दुसरीकडे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती यामुळे बरेच विद्यार्थी आत्महत्या करत आहे. त्यामुळे यावर सरकारने लवकरात लवकर उपाययोजनाची करण्याची गरज आहे.