हिंगोली:- शेतीचे यांत्रिकीकरण या योजनेत लाभार्थ्यांना यंत्रसामुग्री न देता संबंधित दलाल आणि अधिकारी यांनी संगनमत करून अनेक प्रकरणांमध्ये सरकार निधीची अफरातफर केल्या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष धिमान अशोक चक्रवर्ती यांनी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे उपोषण सुरू केले आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनानुसार हिंगोली येथील जिल्हा कृषी अधिकारी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर कृषी अवजारे शेतीचे यांत्रिकीकरण करण्यासाठी दिले जातात. 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षात सुद्धा शेकडो लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. परंतु अनेक प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांना प्रत्यक्षात यंत्रसामुग्री न देता त्यांना केवळ पैसा मिळाला असून यंत्र मिळाली नाहीत. या प्रकारामुळे लाभार्थ्यांचे नुकसान झाले असून शेतीचे यांत्रिकीकरण सुद्धा झाले नाही. या प्रकाराला कृषी विभागातील अधिकारी आणि त्यांचे दलाल जबाबदार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.