डीएम रिपोर्ट्स- केंद्र सरकारच्या वतीने अनलॉकची प्रक्रिया प्रक्रिया राबविण्यात येत असून हळूहळू सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे प्राथमिक शाळा वगळता इतर शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावरील शिक्षण सुरू करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी हिंगोली यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून करण्यात आली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनानुसार, राज्यातील प्राथमिक शाळा वगळता उच्चमाध्यमीक शाळा- विद्यापीठ महाविद्यालये रीतसर सुरुवात करावि अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.
पुढे निवेदन नमुद केले की कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर मागील ६ महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन चालू आहे. त्याचा एक भाग म्हणून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आलेली आहेत. कोरोनाचा निपटारा करण्यासाठी राज्य सरकार, प्रशासन, आरोग्य विभाग व जनतेच्या संयुक्त प्रयत्नांना बऱ्यापैकी यश प्राप्त झालेले आहे. दरम्यान राज्य सरकारकडून अनलॉकची प्रक्रिया टप्प्या-टप्प्याने सुरुवात करण्यात आलेली आहे. व्यापार-उद्योग दळणवळण, खाजगी व शासकीय कार्यालयीन कामकाज सुरळीत होऊन पूर्वपदावर येत आहे. सध्याची कोरोना परिस्थिती पाहता बाल वयोगटातील ( १ ली ७ पर्यंत) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोव्हीड लागण होण्याची शक्यता लक्षात घेता प्राथमिक शाळा वगळुन ईतर राज्यातील माध्यमिक व उच्चमाध्यमीक शाळा-महाविद्यालये, विद्यापीठ अजूनही सुरुवात झालेली नाहीत.
लॉकडाऊनच्या कालावधीत यूजीसी, राज्य सरकार, विद्यापीठे व शिक्षण मंडळे आदिंनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना व नियमांनुसार, ऑनलाइन शैक्षणिक कामकाज पार पाडण्याचा प्रयत्न, शैक्षणिक संस्थांमार्फत केला जात आहे. परंतु, मुंबई-पुण्यासारखा थोडाफार शहरी भाग वगळता, राज्यात इतरत्र ऑनलाइन शैक्षणिक प्रणालीचा फज्जा उडालेला दिसतो. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होऊन, तो शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाबाहेर फेकल्या जाण्याची चिन्ह दिसत आहेत. एकीकडे ऑनलाइन अध्यापनाचा आग्रह, तर दुसरीकडे शैक्षणिक संस्थांमधील ऑनलाइन सुविधांची अनुपलब्धता व ग्रामीण विद्यार्थ्यांची असहाय्यता, आदि कारणांमुळे ग्रामीण महाराष्ट्रात शिक्षक-प्राध्यापकांचे ऑनलाइन अध्यापनाचे प्रयत्न बऱ्याच अंशी विफल होताना दिसतात. अशा परिस्थितीत राज्यातील शैक्षणिक वर्तुळातून -महाविद्यालये -विद्यापीठ सुरुवात करण्याची आग्रही मागणी समोर येत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने नियमांच्या अधिन राहून राज्यातील उच्चमाध्यमीक शाळा-महाविद्यालये -विद्यापीठ रीतसर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष सागर डबराशे यांच्या नेतृत्वाखाली दि.१० स्पटेबंर रोजी हिंगोली जिल्ह्यातील महाविद्यालया समोर घंटानाद आंदोलन करण्याचा ईशारा जिल्हाप्रमुख किरण घोंगडे यांनी दिला.
या निवेदनावर युवा जिल्हाप्रमुख विक्की काशिदे, शहराध्यक्ष योगेश धबाले, उपाध्यक्ष विनोद जोगदंड, शामराव मोगले, मिडिया तालुका अध्यक्ष यशवंतराव साळवे, युवा नेते अशिष मुळे, अमोल काशिदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.